Inside Story : चीनच्या सैनिकांनी कसा केला धोक्यानं भारतीय जवानांवर हल्ला ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी गेलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २० सैनिक शहीद झाले. जाणून घेऊया चीनच्या सैन्याने एका मोठ्या षडयंत्रांतर्गत आपल्या सैनिकांवर कसा हल्ला केला…

वास्तविक लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता की, १५ जून रोजी सीमा भागात चीनी सैन्याचा जमाव कमी होईल. चीनी सैन्य गलवान प्रदेशातील त्यांच्या हद्दीत परत जाईल. १६ जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी चीनी सैन्य माघार घेईल यावर दोन्ही बाजूंनी आधीच सहमती दर्शवली होती.

परंतु या सहमती नंतरही चिनी सैन्यात कोणतीही हालचाल दिसली नाही, तेव्हा १६ बिहार रेजिमेंटच्या सैन्य दलातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी चिनी पक्षासह बोलणी करण्यासाठी गेली. चर्चेदरम्यान चिनी सैन्य माघार घेण्याच्या मन:स्थितीत दिसले नाही. ते मुद्दाम टाळतच राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना घेरले आणि लाठी, दगड आणि काटेरी तारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. या चकमकीदरम्यान एका भारतीय जवानांच्या तुलनेत ३ चिनी सैनिक होते. परंतु अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी अचानक झालेल्या या हल्ल्याचा सामनाच केला नाही, तर चोख प्रत्युत्तरही दिले.

सुमारे ३ तास दोन्ही बाजूने चकमक झाली. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना गंभीर दुखापत झाली. ही चकमक सुरू झाल्यानंतर भारतीय सैनिकांची दुसरी टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर चीनच्या या धोक्याबद्दल सैन्याने चांगलेच प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने चिनी सैन्याला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवल्याची माहिती मिळत आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, या हिंसक चकमकीत ४३ चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र चीनकडून याची खातरजमा केलेली नाही. दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी देखील एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी परिस्थितीबद्दल चर्चा केली. लडाखमधील परिस्थिती पाहता सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांचा पठाणकोट दौरा रद्द केला.