India vs Australia, 4th Test : टीम इंडियाकडून ‘कांगारूंची ‘शिकार’ ! बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – India vs Australia, 4th Test Day 5 : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली संकटांवर मात करताना टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. ॲडलेडवरील ‘३६’च्या आकड्यानंतर टीम इंडिया असा कमबॅक करेल, याचा स्वप्नातही ऑस्ट्रेलियन संघानं विचार केला नव्हता. प्रमुख खेळाडू जखमी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. भारतानं ३ विकेट राखून हा सामना जिंकला. गॅबावर टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला.

मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाची २६ षटकं वाया गेली आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता होती. ३२८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ७) माघारी परतल्यानंतर शुबमन गिल ( ९१) व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गिलला माघारी जाताना भारतीयांनी हळहळ व्यक्त केली. इतकी सुरेख फटकेबाजी करणाऱ्या गिलचे शतक व्हायला पाहिजे होते, असे सर्वांना मनोमन वाटत होते. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. त्यानं पॅट कमिन्सच्या एका षटकात २० धावा चोपून काढल्या.

ऑसी गोलंदाजांचा वेगवान चेंडू शरिरावर झेलूनही पुजारा अभेद्य भींतीप्रमाणे उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही दमदार खेळी केली. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या विजयासाठीचे प्रयत्न केले.

पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियानं गॅबा कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर चषक ( Border-Gavaskar Trophy) सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवला. २०१७ ( भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावस्कर चषक स्वतःकडे ठेवला.