परिस्थिती ‘जैसे थे’ करा, 15 तासाच्या मॅरेथॉन बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट ‘संदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन मध्ये तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील तणाव पूर्णपणे कमी करुन, परिस्थिती सामान्य करण्यासाठी काल भारत आणि चीनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. 15 तास चाललेल्या बैठकीत नियंत्रण रेषेजवळ परिस्थिती पहिली होती तशी, जैसे थे करा, असे भारतीय लष्कराने चीनी सैन्यांना स्पष्टपणे सांगितले.

भारतीय लष्कराने चीनी सैन्याला स्पष्ट केलं की, सीमा व्यवस्थापन आणि पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यासाठी परस्पर सहमतीने ठरवलेल्या सर्व गोष्टी पाळाव्या लागतील. सरकारी सुत्रांनी बुधवारी सांगितले की, दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये अनेक जटिल मुद्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. बुधवारी रात्री दोन वाजता ही बैठक संपल्याचे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

सुत्रांनी सांगितले की, पूर्व लडाखमधील परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आता चीनवर आहे. चीनी सैन्याने पूर्व लडाखमधील चार ठिकाणी घुसखोरी केली होती. या सर्व ठिकाणाहून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पँगाँग टीएसओ हा कळीचा मुद्दा होता. पण तेथूनही चीनी सैन्य मागे हटले आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हद्दीतील चुशूल येथे सकाळी अकरा वाजता लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चौथ्या फेरीची चर्चा झाली. सध्या तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला आहे. मात्र अद्याप परिस्थिती पहिल्यासारखी झालेली नाही.