नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. बीसीसआयने कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरित दोन एकदिवसीय सामने लखनऊ आणि कोलकत्ता येथे होणार होते.
https://twitter.com/ANI/status/1238439908080889858/photo/1
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. दुसरीकडे कोरोना विषाणूच्या भीषण परिणामाचा परिणाम मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांवर झाला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहाता हे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, गुरुवारचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने म्हटले आहे की, उर्वरित दोन सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार होते.
शुक्रवारी परिस्थिती वेगळीच पहायला मिळाली. सुरुवातीला आयपीएलचे सामने 1 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या सुत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील उर्वरित दोन सामने न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित दोन सामने 15 मार्चला लखनऊ आणि 18 मार्चला कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार होते.