अतुल भातखळकरांची नाना पटोलेंवर टीका, म्हणाले – ‘राज्य कायद्याचे आहे, पप्पा किंवा पप्पूचे नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या सुरू असलेल्या इंधन दरवाढीवरून आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टिवटिव करणारे अभिनेते आता गप्प का असा सवाल करत पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शुटींग करू देणार नाही असा थेट इशारा दिला. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पटोलेंवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत लिहलं की, नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का ? सत्ता तुमची असली तरी मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो. तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे, पप्पा किंवा पप्पूचे नाही असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले ?
अभिनेत्यांवर टीका करताना नाना पटोले म्हणाले होते की, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सारखी टिवटिव करणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का ? त्यावेळी पेट्रोलची किंमत 60 रुपये असताना हे अभिनेते शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का. केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का ? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.

पुढं बोलताना ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेची परवड होत आहे. अशात अमिताभ आणि अक्षय यांचं मौन योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शुटींग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठे शटुींग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू असा थेट इशारा पटोलेंनी दिला होता.