Solapur : लग्नानंतर ती पाच दिवसातच झाली विधवा

वडीगोद्री :पोलीसानामा ऑनलाईन
देवदर्शनाला निघालेल्या नवरदेवाच्या गाडीचा औरंगाबाद-सोलापूर महामार्गवरील डोमेगाव फाटा येथे आज बुधवारी अपघात झाला. या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाल्याने पाच दिवसातच नववधूला वैधव्य आले. या अपघातातात नवरदेवासह मावस बहीणीचा देखील मृत्यू झाला आहे.

अंबड तालुक्यातील खेडगाव येथे अमित गोडसे आणि अश्विनी या दोघांचा चार मे रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर ते बुधवारी (ता.9) पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. अंबड तालुक्यातील डोमेगाव फाट्याजवळ नवरदेवाच्या बोलेरो आणि दुधाच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये पती अमित गोडसे आणि त्यांची मावस बहीण वंदना चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.
नववधू अश्विनी ही या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या गाडीतील शिवकुमार ओमप्रकाश अंबाला, नितेश सुरेशकुमार,शहाजी नानासाहेब लांडगे, मच्छिंद्र साहेबराव कुबेर हे जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत खेदाची बाब अशी की, ही घटना गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असतानाही तब्बल चार तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.