दहशतवाद्यांची भरती थांबली मात्र PAKकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच : DGP J & K

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर आता तेथील परिथितीत हळू-हळू सामान्य होत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बुधवारी सांगितले. तसेच स्थानिक तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये नवीन भरती होत असल्याची घटना समोर आलेली नाही असेही स्पष्ट केले. केंद्रातील सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर मधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तेथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले होते. आता काश्मीर मधील परिस्थितीत सामान्य होत आहे. तसेच स्थानिक तरुणाच्या दहशतवादी संघटनांमधील भरतीला पायबंद बसला असल्याचे महासंचालकांनी सांगितले आहे.

भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणण्यात यश
जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी असे सांगितले की, दहशतवाद्यांकडून काही फळ विक्रेत्यांना धमकावण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या गोष्टीची पोलिसांना चांगलीच कल्पना असून पोलीस त्याकडे लक्ष्य देत आहे. जेणेकरून त्यांना कोणी धमकावू नये. मीडियाशी बोलतांना त्यांनी सांगितले की, काही तरुणांना दहशतवाद्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही जणांना वापस आणण्यात यश मिळाले आहे. काही ठिकाणी पाकिस्तानकडून घुसखोरी होण्याच्या बातम्या येत आहेत. मागच्या महिन्यात गुलमर्ग सेक्टर २ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना सेनेकडून पकडण्यात आले होते.

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न
मागच्या आठवड्यात भारतीय सैन्याकडून असे सांगितले गेले होते की, परिसरात दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. २१ ऑगस्ट रोजी गुलमर्ग सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर-ए-तैयबाचे २ दहशतवादी मोहम्मद खलील आणि मोहम्मद नाझीम यांना अटक करण्यात आली.त्याचे व्हिडिओ क्लिपस्वरूपात दाखविण्यात आले आहेत. हे दोघेही रावळपिंडीचे रहिवासी आहेत.

काश्मीर मधील जनजीवन सुरळीत होत आहे
जम्मू काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक म्हणाले की, काश्मीर परिसरातील जनजीवन आता हळूहळू रुळावर येत आहे. येथील शाळा पूर्ववत होत आहेत. मुलं शाळेत जाऊ लागले आहेत. तसेच कर्मचारी कार्यालयात जाण्यास सुरवात झाली आहे. जरी दक्षिण काश्मीरमध्ये फळ विक्रेत्यांना दहशतवाद्यांनी धमकावले असले तरी पोलिसांच्या विशेष सुरक्षेमुळे त्याच विक्रेत्यांवर विशेष परिणाम झाला नाही. बुधवारी पोलीस महासंचालकांनी सांगितले की २३० ट्रक दक्षिणेकडील काश्मीर जिल्ह्यातून दरीच्या बाहेरील बाजारात फळे पोचवण्यासाठी रवाना झाले आहेत. आता येथील जनजीवन आता सुरळीत होत चालले आहे.