बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बारावीच्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतिक्षा संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

कोरोनामुळे दहावी बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. यंदाचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या 4.7 टक्क्याने निकाल चांगला लागल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे.

मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा निकाल 88.4 टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल 82.33 टक्के, वाणिज्य शाखेचा 91.27 टक्के तर विज्ञान शेखेचा निकाल 96.93 टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के निकाल लागला आहे.

यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजारांनी अधिक आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.