आमदार गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ गोष्टीतील गाढव कोण ?

पोलिसनामा ऑनलाईन : पूजा चव्हाण आत्महत्या, मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यावरून पडळकरांनी विधान परिषदेत सरकारवर घणाघात केला, तसेच फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची असं सांगत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

विधान परिषदेत गोपीचंद पडळकर म्हणाले की, एका गावात मूर्तीकार होता, मूर्त्या बनवत होता, त्याच्याकडे एक गाढव होता, तो त्या गाढवावर मूर्त्या घेऊन गावोगावी फिरत होता, ओझं वाहणं गाढवाचं काम आहे, ज्यावेळी गाढवाच्या पाठीवर मूर्त्या असायचा तेव्हा गाढव पुढे पुढे जायचं, त्यावेळी गावातील माणसं त्याला नमस्कार करायची, कारण त्या गाढवावर हनुमानाची मूर्ती असायची, गणेशाची मूर्ती असायची, दत्ताची मूर्ती असायची लोकांना ती मूर्ती दिसायची आणि असचं महाराष्ट्रात घडलं, ज्यांनी फुले, शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, त्यांना महाराष्ट्रातील लोकांनी नमस्कार केला, त्यांना वाटलं हा नमस्कार मलाच आहे, ते गाढव मालकावर बिनसलं, तेव्हा मालकाने गाढवाला सांगितले, अरे गाढवा, ते तुला नमस्कार करत नाहीत तर तुझ्या पाठीवर ज्या मूर्त्या आहेत त्यांना नमस्कार करत होते, त्यामुळे फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावून जे फिरले त्यांना असं वाटलं की जनता त्यांना नमस्कार करतेय, पण असं नव्हतं, ते तुम्हाला नमस्कार करत नव्हते, तर जो फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडत होता, त्याला जनता नमस्कार करत होते, ते आता जनतेला माहिती आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

दरम्यान, भाजपा(BJP) सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला(Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा राजकारणाचा विषय नाही, मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करतंय, या माध्यमातून सामाजिक समीकरण बिघडवली जात आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी सुरू होती, तेव्हा वकिलांकडे कागदपत्रे पुरवली नसल्याचं समोर आलं, मराठा आरक्षणासाठी वेळकाढूपणा केला जातोय असं सांगत पडळकरांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली. तसेच जर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर हे राज्य चालतं, पण पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बिघडली, ६०० पैकी ३०० कोटींपर्यंत ठेवी कमी झाल्या, ज्या फुलेंच्या नावावर तुम्ही राज्यात जागर घालतायेत, त्या विद्यापीठाची अवस्था अशी करून ठेवली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा भत्ता गोठवला, त्यांची बाजू तुम्ही घेत नाही, नुसतं भाषणात फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण असं चालणार नाही, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत, मागासवर्गीयांच्या भरतीतील आरक्षण कायमचं बंद केलं, ही तुमची विचारसरणी कुठली? बेरोजगारांच्या बाबतीत घोषणा केल्या जातात मग १२ हजार आदिवासींची पदे रिक्त आहेत, महाराष्ट्रातील अनेक जाती लाभांपासून वंचित आहे, मग फुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची अन पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवीत असंही गोपीचंद पडळकरांनी सांगितले.