राज्यातील मृत्यूदर शून्यावर आणणं हेच प्रमुख उद्दिष्टयं, कोरोनाला हरवण्यासाठी मुख्यमंत्र्याचं आणखी एक पाऊल

मुंबई,पोलीसनामा ऑनलाईन – ज्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांचीही संख्या वाढत आहे. मात्र, आता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आणखी एक पाऊल टाकत आता मृत्यूदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत, जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यूदर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता अधिक प्रमाणावर तपासण्या करून मृत्यूदर शून्यावर आणणे, हेच आता एकमेव उद्दिष्ट्य ठेवले आहे.

त्यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी नुकताच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून चर्चा केली. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन केले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मृत्यूदर कमी नाही तर शून्यावर आणणे, हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे. त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार दिले जात आहेत. तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसुत्रीपणा आणि समानता असणे गरजेचे आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित केली आहे.

मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले असून सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण, त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे गरजेची आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत कोरोना साथीला नियंत्रणात ठेवले. तसेच रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे, हे देखील तितकेच महत्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

या बैठकीचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळीटास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी यावेळी सांगितले, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जात आहेत. त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये, अडचण येईल तेव्हा तत्काळ आम्हाला संपर्क करावा.

त्यानंतर डॉ. राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप गरजेचे आहे. डॉ शशांक जोशी , डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स आणि शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून शंका निरसन केले. तसेच उपचाराविषयी सूचना केल्या.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती.

राज्यात मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. यात पन्नाशी आणि साठ वर्षे ओलांडणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान या सरकारपुढे आहे. यात मृत्यू होणार्‍या रूग्णांमध्ये कोरोनामुळे कितीजण मृत्यूमुखी पडले आहेत? याचा अंदाज आणि त्याची आकडेवारी पाहणे आवश्यक असणार आहे.

राज्यात अनेकांचा मृत्यू हा अनेक कारणांमुळे होत आहे. सध्या कोरोना विषाणूची साथ आहे, म्हणून मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण किती आहे. तसेच त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता की नाही?. तसेच मृत्यू पावलेल्या रूग्णाला अगोदर कोणकोणते आजार होते?. यांसह अनेक बाबीं सखोलपणे लक्षात घेऊन पावले टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे आता कोरोना साथीमुळे मृत्यूदर कमी करण्याचे एक प्रकारचे आव्हान असल्याचे समजत आहे.

याचबरोबर कोरोना विषाणूबाबत अनेकांच्या मनात बसलेली भीती देखील दूर करणे आवश्यक आहे. तरच कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूदरात घट होऊन योग्य आकडेवारी आपल्यापुढे येऊ शकेल.