पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय ? : खा. संभाजीराजे

ADV

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी झाली. मात्र, पाच सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र, आजच्या निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर खासदार संभाजीराजे भोसले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. खासदार संभाजीराजे म्हणाले, माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचे कळत नाही. तोपर्यंत इतर माध्यमांतून त्यांना कशी मदत करता येईल याचा युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे. 25 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, असंही ते म्हणाले.

तोपर्यंत काय मदत करणार?

खासदार संभाजीराजे म्हणाले, मी असं म्हणणार नाही की, रोहितगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही. रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला कळत नाही. पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारने सांगावे, असे ते म्हणाले.

सरकारने भूमिका स्पष्ट करावी

आज महाविद्यालये सुरू झाली आहेत. ही सुनावणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही. माझ्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कालही ते सकारात्मक दृष्टिकोनातून माझ्याशी बोलले. मोठेपण दाखवत स्वत:हून फोन करून चर्चा केली. सगळं मान्य आहे. पण पुढे काय करायचं हे सरकारने सांगावं, असे सांगत त्यांनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.