विनायक मेटेंची मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले – ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा घटना बाह्य असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयांनी तो कायदा रद्द ठरवला आहे. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावरून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळेच सरकारच्या हाती अपयश आलं आहे. याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलीय.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर विनायक मेटे हे आक्रमक झाले आहेत. त्यावेळी मेटे यांनी नाशिकमध्ये माध्यमाशी सवांद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, परंतु, मुख्यमंत्री ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं हाताळलेला नाही. त्यामुळे त्यांनीही राजीनामा देण्याची गरज आहे, असे म्हणत मेटे यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय.

विनायक मेटे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू आहेत. म्हणून मराठा समाजाने संयम बाळगला आहे. परंतु, लॉकडाऊन संपताच भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही बीडमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असे स्पष्ट मेटे यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही केंद्राच्या पाया पडतो. परंतु, त्यांनी आरक्षण द्यावं. केंद्राच्या पाया पडण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राला द्यावा आणि पुढची कारवाई करावी, तसेच, अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे विनायक मेटेंनी म्हटले आहे.