‘राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले आमदार पुन्हा परत येण्यास आतुर, लवकरच निर्णय घेणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा परतण्यास उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हा निर्णय सार्वजनिक जाहीर केला जाईल, असेही मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही आमदार शरद पवार, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी तयार करून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्याच प्रमाणे नोव्हेंबरमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते
उदयनराजे भोसले – सातारा
शिवेंद्रराजे भोसले – सातारा
राणाजगजितसिंह पाटील – उस्मानाबाद
धनंजय महाडिक – कोल्हापूर
बबनराव पाचपुते – श्रीगोंदा
रणजीतसिंह मोहिते-पाटील- माळशिरस
मधुकर पिचड – अकोले
गणेश नाईक – नवी मुंबई