‘अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने आरे येथे कारशेडसाठी जागा निश्चित केली होती. मात्र, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेडची ही जागा रद्द करुन इतरत्र हालवण्याचे प्रयत्न झाले. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल , अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 28) फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, मी नुकतेच दिल्लीहून एअरपोर्टला जाण्यासाठी मेट्रोमध्ये बसलो तेव्हा मला एक तास वेळ लागला. त्याचवेळी माझ्या लक्षात आले की, कुलाब्यावरुन मुंबई विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला 2021 मध्ये केवळ 25 मिनिट लागतील. आता 2021 उजाडले असून 80 टक्के काम झाल आहे. उर्वरीत काम थांबले आहे. तेंव्हा मग माझ्या लक्षात आले की, पुढची 2-3 वर्षे काम होऊ शकत नाही. कारण जर मुंबई विमानतळावर कुलाब्यातून किंवा मुंबईतील कुठल्याही भागातून लोकल किंवा मेट्रो-3 मधून जायचे असेल तर आरेमध्येच कारशेड कराव लागेल. पण काही लोकांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला त्यामुळे पुढील चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो-3 मध्ये बसता येणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबईकरांना मेट्रो-3 किंवा अंडरग्राउंड मेट्रोचे जर फोटो काढायचे असतील तर दिल्ली किंवा कोलकात्यालाच जाऊन फोटो काढावे लागतील, मुंबईत तशी संधी मिळेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तसेच नुकत्याच राज्यात झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचं मोठा पक्ष ठरला हे जनतेने दाखवून दिल्याचे ते म्हणाले.