दगडाने ठेचून २ मित्रांचा निर्घृण खून

बेळगाव : वृत्तसंस्था – शेतात नांगरणी करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा धारदार हत्याराने वार करुन तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी बेळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. बेळगाव तालुक्यातील एका शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या दोन मित्रांचा मृतदेह आज सकाळी शेतकऱ्यांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
बसनगौडा सोमरेड्डी पाटील (वय २५) व पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लनावर (३०, दोघेही रा. मारिहाळ) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे मित्र असून ते मूळचे बदामी जिल्ह्यातील आहेत. गेल्या ४५ वर्षांपासून ते मारिहाळ येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री हे दोघेजण मारिहाळपासून एक किलोमीटर आत असलेल्या विठ्ठल मल्हारी यांच्या शेतात नांगरण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परतले नाहीत. रविवारी सकाळी शेजारच्या शेत मालकाने ही घटना पाहिली व त्यांनी मारिहाळ पोलिसांना कळविले. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, डीसीपी सीमा लाटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा खून कोणी व कशासाठी केला? हे अद्याप समजू शकले नाही. मृतांपैकी बसवराज याचा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.