Supriya Sule : ‘पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, CM ठाकरे नक्की न्याय देतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यासारखी प्रशासकीय यंत्रणा देशपातळीवर नाही. परंतु, अशा घटना घडणे, अतिशय वेदनादायी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालावे, अशी विनंती सुळे यांनी यावेळी केली. पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सुळे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. ते दीपाली चव्हाण यांना न्याय देतील, असा विश्वास करत दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात आपण कमी पडलो, अशी कबुली सुळे यांनी दिली. दीपाली चव्हाण यांचे कुटुंब कोणत्या मनःस्थितीतून जात असेल, याची कल्पना करवत नाही. त्यांच्या आईची काय स्थिती असेल, याचा विचारही करू शकत नाही, असे सांगत सुळे यांनी चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. चूक कोणाची आहे, त्यात मी पडत नाही. मात्र, पुरुष किंवा महिला अधिकारी कुणीही असो, त्यांना त्रास होत असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा असावी, अशी एखादी यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी उभी करावी. या संदर्भात लोकसभेतही विषय मांडला होता, असे सुळे यांनी सांगितले.