नगरचा तिढा संपत आलाय राष्ट्रवादीच लढविणार : अजित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघाचा आघाडीतील तिढा जवळपास संपत आलाय. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे, असा दावा राष्ट्रवादी नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

परिवर्तन यात्रा सध्या नगर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. त्यानिमित्त आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, नगरच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला तरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवली जाणार आहे. दोन्ही पक्षांचे याबाबत एकमत होत आले आहे. जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच ठेवली जाईल.

विखे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना पवार म्हणाले की, आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने बंडखोरी केल्यास त्याचा फायदा विरोधी उमेदवारास झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे उमेदवारी देताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. विकी यांच्याशी योग्य ती चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

आज पाथर्डी तालुका व नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे परिवर्तन निर्धार यात्रेच्या सभा होणार आहे. अजित पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आदी वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.