मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यात आता फेरबदल झाला असून दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खरंतर या हालचाली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चालू झाल्या होत्या. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेची अग्निपरीक्षा असून महाविकास आघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. उद्या बहुमत चाचणीचा मुहूर्त ठरला असून उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी उद्याचा दिवस महाविकास आघाडीसाठी खूप महत्वाचा आहे.
A special session of the Maharashtra assembly called for tomorrow. https://t.co/K7lpNWmUzv
— ANI (@ANI) November 29, 2019
तत्पूर्वी विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली होती. या यादीमध्ये भाजपाच्या तीन, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन आमदारांच्या नावांचा समावेश होता. यातून राज्यपालांनी भाजपाच्या कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यात आता फेरबदल करण्यात आला असून कोळंबकर यांच्याऐवजी दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra: Nationalist Congress Party (NCP) MLA Dilip Walse Patil appointed as Protem Speaker of the state assembly. pic.twitter.com/NMDtCUEo9y
— ANI (@ANI) November 29, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा विजयी झाले असून, त्यांनी विजयाचा षटकार पार करत आपल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. परिसरात त्यांच्याविरुद्ध तगडा विरोधक अजून तरी कुणीच नाही. २००९ ते २०१४ या कालखंडात दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते.
ते राजकारणात सक्रिय सहभाग घेत होते त्या काळात जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्यावर विशेष प्रभाव होता. मात्र १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळवले आणि निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात किसनराव बाणखेले यांचे गुरु शिवाजीराव पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. त्यांच्यातील टोकाच्या लढतीत दिलीप वळसे-पाटील यांनी बाजी मारली आणि अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. आघाडी सरकारच्या काळात दिलीप वळसे-पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभाग अशी महत्वाची आणि मोठी मंत्रिपदं सांभाळली आहेत.