मुंबईत नाइट क्लबमुळं रात्री संचारबंदी ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे मुंबईत या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले जात असतानाच, दुसरीकडे मात्र नाइट क्लब किंवा तत्सम ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे समोर आले आहे. परळ येथील एपिटोम आणि वांद्रे येथील नाइट क्लबवर मुंबई महापालिकेने धाड टाकल्यानंतर तेथे कोरोनाचे सर्व नियम माेडत असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत नाईट क्लब सुधारले नाहीत, तर रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत मुंबईत संचारबंदी लागू केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. याबाबत राज्यसरकारकडे प्रस्ताव दिल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांना माहिती देताना चहल म्हणाले की, शहरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांच्या खाली आली आहे. परंतु कोरोनाचे समूळ नष्ट झाले नाही. काही दिवसांवर आलेल्या नाताळ, ३१ डिसेंबर डोळ्यासमोर ठेवता पुढील १५ दिवसांत किती रुग्ण आढळतात? यावरही पालिका नजर ठेवणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर पुढच्या वर्षी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होतील, तसेच आगामी काळात मुंबईतील सर्व नाइट क्लबवर महापालिकेची नजर आहे. येथे जर कोरोनाचे नियम मोडले गेले, तर कारवाई करण्याचे आदेश सर्व २४ विभागांतील आयुक्तांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

निष्काळजीपणा वाढल्याने आणखी कठोर कारवाई होणार
नाइट क्लबमध्ये कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. जत्रेमध्ये जशी गर्दी असते तशी गर्दी या क्लबमध्ये दिसत असून पहाटे ४ वाजेपर्यटन हे क्लब सुरू असतात. मात्र, कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या परळ आणि वांद्रे येथील कारवाईनंतर आता आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कोणत्याही कार्यक्रमांना ५० नागरिकांना परवानगी दिली जाते. सामाजिक अंतर पाळा, मास्क घाला, सॅनिटायजर वापरा, अशा सूचनाही दिल्या जातात. मात्र, बहुतांशी ठिकाणी सगळे नियम धाब्यावर बसविले जातात. खबरदारी घेतली गेली नाही तर प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागणार आहे त्यासाठी राज्य सरकार संचारबंदी लागू करू शकते. तूर्त तरी संचारबंदी लागू करण्याचा राज्य सरकारच्या विचाराधीन नाही.