संपूर्ण लॉकडाउन उठविण्याची घाई नाही : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुन्हा लॉकडाउनची वेळ आली होती. सध्या राज्यात कोरोनाची पहिलीच लाट आहे. कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही त्यासाठी सरसकट टाळेबंदी उठविण्याची घाई नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्परन्सच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला याची पूर्ण कल्पना असून घाई गडबडीत शाळा सुरू केल्या आणि जर शाळेत संसर्ग पसरला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. दुसरी लाट अधिक धोकायदाय असल्याने ती कशी थोपवायची याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी लॉकडाउन उठविण्याची घाई झाली आहे. तिथे पुन्हा टाळेबंदी करावी लागत आहे. त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी उठविण्याऐवजी टप्प्या टप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिकांना होते. लहान मुलांना होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुलांना करोनाची लागण झाली. त्यामुळे सहा महिन्यांच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.