देहू-रोड नव्हे, ‘छोटे बिहार’, म्हणा…. !

पिंपरी-चिंचवड पोलीसनामा ऑनलाईन
कृष्णा पांचाळ,

दिवसेंदिवस पिंपरी चिंचवडच्या देहूरोड मध्ये टोळ्यांचा राडा वाढतच चालला आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहशद माजवण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड,महिलांना मारहाण,अल्पवयीन मुलांना टोळीत सहभागी करून घेण्यासाठी चाललेली धरपकड,गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करत वाहनांची तोडफोड, दिवसा नंग्या तलवारी घेऊन फिरणे हे सर्व पाहता देहूरोड हे गुन्हेगारीतील बिहार असल्याचा भास होतोय.

पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्या कारकिर्दीत सर्वात जास्त तोडफोडीच्या घटना घडल्या असून गुन्हेगारांवर वर्चस्व मिळण्यास त्यांना अपयश आले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता प्रकाश धस हे पोलीस निरीक्षक देहूरोड पोलीस ठाण्याला मिळाले आहेत. त्यांनी हुक्काबार वर कारवाई करत चुणूक दाखवली खरी परंतु ते आल्यापासून तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे असेच म्हणावे लागेल. याप्रकरणी त्यांनी फोनवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे.अनेक वेळा पोलिसांवर देखील आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तरीदेखील देहूरोड पोलीस मूग गिळून गप्प आहेत. यामागे आर्थिक गणित असल्याचं बोलला जात आहे.एका महिलेच्या मुलीचे अपहरण झाले असून अद्यापही मुलगी देहूरोड पोलिसांना सापडलेली नाही.अपहरणकर्त्या मुलांच्या वडिलांकडून एका पोलिस उपनिरीक्षकाने मोठी रक्कम घेतल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारा पेक्षा आर्थिक गणित जास्त महत्वाची असल्याने गुन्हेगारीवर आळा बसवण्यास त्यांना अपयश येत आहे. नवीन पोलीस निरीक्षक प्रकाश धस हे याकडे कसं पाहतात हे देखील महत्वाचं आहे.

देहूरोड येथे वोफल आणि तामिळ टायगर्स अश्या तामिळी समाजातील दोन टोळ्या आहेत यांच्यात बऱ्याच वेळेस वर्चस्वासाठी वाद झाले आहेत. अगदी तलवारी,कोयते आणि चाकू घेऊन हे दिवसाढवळ्या परिसरात वावरतात आणि तरुणांना टोळीत सामावून घेण्यासाठी जीवे मारण्याची धमक्या ही देतात. देहूरोड हे गाव गुंडांचा अड्डा बनत आहे. काही महिन्यांपूर्वी सुरुवातीला अल्बर्ट जोसेफ आणि अविनाश या अल्पवयीन मुलांना वोफल टोळीत सामील होण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र ते तयार न झाल्यानं त्यांना बेदम मारहाण केली गेली. प्रकरण इथेच थांबलं नाही तर वोफल टोळीने काहींच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण करत, पैसे आणि दागिने घेऊन लंपास केले होते. नागरिकांनी वारंवार तक्रार दाखल करून देखील पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याचा सांगितले होते. गुंडांना ताब्यात घेऊन फक्त राजकीय दबावापोटी त्वरित सोडून दिले जाते. गेल्या आठवड्यात अल्पवयीन गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करत वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सलग दोन ते तीन दिवस वाहनांची तोडफोड यासारख्या घटना घडतच होत्या.

 दिनांक- ३ जुलै २०१७,
टोळक्याने दहशद माजवण्यासाठी १० वाहनांची धारदार शस्त्राने केली तोडफोड.

दिनांक- ३ मे २०१८,
६ वाहनांची तोडफोड दोन महिलांना बेदम मारहाण,
हॉकी स्टिक,लाकडी दांडके,कोयते,यांचा वापर.

दिनांक-१३ मे २०१८,
आंबेडकर रोडवर पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनांची तोडफोड.

दिनांक-२५ मे २०१८,
गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करत धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड.

दिनांक-२६ मे २०१८,
एटीएम आणि दोन दुचाकी वाहनांची तोडफोड.

मागील काही महिन्यापासून या टोळ्या देहूरोड गावात धूड़घुस घालत आहेत. मात्र अश्या घटनांवर पोलिस प्रशासनाकडून देखील कोणतीही कठोर करवाई होत नाही, त्यामुळं परिसरातील नागरिक दहशती खाली आहेत.देहूरोड येथे असे वाद, वाहनांची तोडफोड नेहमीच होतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने परप्रांतीय राहतात त्यामुळे गुन्हेगारी स्वरूपाचे वातावरण आहे. देहूरोड पोलीस आता तरी याकडे लक्ष देणार का हे पाहावं लागणार आहे.