निलेश राणेंची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘ममता बॅनर्जींचे कसंल गुणगाण गाताय ? भाजपने पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून ठोकलंय’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करत ममता बॅनर्जीं यांच्या टीएमसीने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान अवताडे यांनी भगिरथ भालकेंचा 3 हजार 716 मतांनी पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भाजपाचे नेते आणि माजी आमदार निलेश राणे यांनी ट्विट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचे कसंल गुणगाण गाताय ? भाजपने पंढरपूरात तुम्हाला घरात शिरून ठोकलंय असे म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या टविटमध्ये म्हटले आहे की, त्या अजित पवारांना शोधा. ते नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून भाजपाने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जीचे कशाला गुणगाण गाताय ? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रासुद्धा नाही. संजय राऊत तुम्ही स्वतः कधी निवडून येणार ते सांगा? असा सवालही राणे यांनी केला आहे. तसेच बंगालमधील निवडणूक निकालासंदर्भातही राणे यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणाव लागले. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता तो पहिल्यांदा आठवला. हे काय कमी आहे, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.