मुंबई : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या बाजुने आपले मत मांडले होते. अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी बोलताना, शरद पवार हे काँग्रेसची वकिली करत आहेत. काँग्रेसला त्यांच्यासारखा मोठा वकिल लाभला आहे. तर, पवारांनाही काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी अहमदनगर येथे केली.