PM-Kisan योजनेला 2 वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदीनी केले ट्विट, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या पीएम किसान योजनेला बुधवारी (दि. 24) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी या योजनेला 2 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच या योजनेमुळे देशातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत. ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठी आणि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त सरकारकडून किमान आधारभूत किंमत वाढवण्यावरही भर दिला जात आहे. गेल्या 7 वर्षात केंद्र सरकारने कृषीमध्ये बदल करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत. यात शेतकऱ्यांसाठी सिंचनापासून ते अधिक तंत्रज्ञान, बाजारापासून योग्य पीक विम्यापर्यंत, मृदा स्वास्थवर लक्ष केंद्रीत करण्यापासून मध्यस्थांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोदीनी म्हटले आहे.

दरम्यान 2019 मध्ये आजच्या दिवशीच ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सरकारकडून ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.