Pooja Chavan Suicide Case : ‘मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे’; CM ठाकरे यांचा राठोडांना इशारा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  लवकरच राज्यातील अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सध्या राज्यात संजय राठोड प्रकरणावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. ते कमी होण्याची कसलीच चिन्हे दिसत नाही आहे. सध्या त्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर ते १५ दिवस गायब होते. त्यानंतर त्यांनी अचानक पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून आपली बाजू मांडली.

गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवसेना लवकरच संजय राठोड यांच्या बद्दल निर्णय घेणार आहे असे सांगण्यात आले आहे. संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. आणि त्यामध्येच शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि कोरोना काळात जमावलेल्या गर्दीमुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांनी या कारणावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. यामुळे संजय राठोड आणि महाविकास आघाडी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याकडून सुद्धा या प्रकरणावर नाराज व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये या बाबतीत चर्चा सुद्धा झाली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे असं बजावल्याचे वृत्त झी २४ तासकडून देण्यात आले आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संजय राठोड यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. एका बाजूला विरोधकानी राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे तर दुसऱ्या बाजूला मित्र पक्षसुद्धा संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा अधिवेशनापूर्वी राजीनामा ही बातमी समाजमाध्यमात पेरून सुसंस्कृत राजकारणाचा बुरखा पांघरण्याचा प्रयत्न केला आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं लॉजिक यामागे आहे असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ते कधीही त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू शकतात. परंतु काहीही करायचं नाही आणि सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम ठेवायचा ह्यातला हा प्रकार आहे. जोपर्यंत संजय राठोड यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांकडून देण्यात आला आहे.

“मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील,” असे म्हणत सरकारच्या धोरणावर भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे या अहवालाला अर्थ नाही असे सुद्धा चित्रा वाघ म्हणाल्या.

पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या सन्मानार्थ करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनामध्ये ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महंत कबीरदास महाराज व त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच गावातून १२३ जणांचे नमूने चाचणीसाठी नेण्यात आले आहेत. संजय राठोड प्रकरणासह इतरही प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेहमीच आक्रमक राहील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नियम फक्त विरोधकांनाच आहेत का?, सत्ताधाऱ्यांना नाहीत का? असे प्रश्न करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.