“जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा होणारच”

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्य आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील मुलांना वाईट मार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी तेथील मातांनी आवाहन केले आहे. काश्मीरमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तसंच जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी ठणकावून सांगितले आहे.

आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करतोय की तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करण्यास सांगा, असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी म्हटले आहे. जो हातात शस्त्र घेणार त्याचा खात्मा होणारच, असंही त्यांनी बजावून सांगितलं.

हेही वाचा – भाजप-सेनेच्या युतीच्या खिरीत ‘हा’ पहिला मीठाचा खडा 

जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामामधील आत्मघातकी स्वरुपाचा हल्ला बऱ्याच वर्षांनी घडवण्यात आला आहे. आम्ही या हल्ल्याची चौकशी करत आहोत. जैश- ए- मोहम्मदने पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाक सैन्याच्या मदतीनेच हा हल्ला केला आहे, असा दावा त्यांनी केला.

पुलवामा हल्ल्यात कोणत्या स्वरूपाचा आणि स्थानिकांचा कोणाचा हात का?, याची प्राथमिक माहिती आमच्या हाती लागली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हा तपासाचा भाग असल्याने अधिक तपशील जाहीर करणार नाही, असे ढिल्लन यांनी सांगितले.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या १०० तासांच्या आत आम्ही जैश-ए-मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. आदिल दार या दहशतवाद्याने हा हल्ला केला होता. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी आहे. तो मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, असंही त्यांनी सांगितलं.