Pune Band | ‘पुणे बंद’च्या मोर्चात हजारोंची उपस्थिती, महापुरुषांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात पुणेकर एकवटले

रस्त्यांवर शुकशुकाट, विविध पोषाख परिधान करुन सर्वसामान्य पुणेकरांचा सहभाग

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.13) ‘पुणे बंद’चे (Pune Band) आवाहन करण्यात आले होते. पुण्यातील सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) पुतळा ते लाल महाल पर्यंत (Lal Mahal) मुक मोर्चा (Muk Morcha) काढला होता. या मोर्चामध्ये (Pune Band) भाजप खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) , शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Leader Sushma Andhare) यांच्यासह शहरातील स्थानिक पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. यावरुन राज्यात गदारोळ झाला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शिवसेना यासह अनेक पक्ष, संघटनांनी मुक मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली. यामध्ये लहान मुले, महिलांचा समावेश लक्षणीय होता. महिलांनी हातामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे फलक घेतले होते, तर काहींनी राज्यपाल हटावचे पोस्टर हातात घेतले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सकाळी पावणे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या पुढे ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा होता. हा मोर्चा खंडोजीबाबा चौकातून टिळक चौक मार्गे लक्ष्मी रोड, बेलबाग चौकातून लाल महाल येथे दुपारी पोहचला. या ठिकाणी मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांची भाषणे झाली.

पुणे बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. त्यामुळे ऐरवी गजबजलेल्या रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. मोर्चा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गावरील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारुन मोर्चाचे स्वागत करण्यात आले. यावेळी वेगवेगळे पोषाख परिधान करुन महिला, लहान मुलांनी मोर्चाचे स्वागत केले.

 

मुक मोर्चामध्ये सहभागी झालेले नेते; विविध पक्ष, संघटना, संस्थांचा सहभाग
खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, मदार सुनिल टिंगरे, माजी उप महापौर दीपक मानकर, रूपाली पाटील, काँग्रेस वतीने शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी गटनेता आबा बागुल, रविंद्र धंगेकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी तसेच अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, लोकजनशक्ती पार्टी, शेतकरी कामगार पक्ष सह इतर पक्ष व संघटनांसह विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, विद्यार्थी संघटना व गणेशोत्सव मंडळे यांनी पुणे बंदला जाहीर पाठिंबा देत मोर्चात सहभाग नोंदवला. भारत मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड, लहूजी आर्मी संघटना, सत्यशोधक बहुजन आघाडी व अन्य अनेक सामाजिक संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

‘छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान मैदान में’
“छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान मैदान में” अशी घोषणा देत मुस्लिम संघटनेने पुणे बंदला पाठिंबा देत मोर्चात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही. महाराजांच्या सन्मानार्थ आम्ही या मोर्चात सहभागी झाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्यांच्या खुर्च्या जनतेने हिसकावल्या पाहिजेत – सुषमा अंधारे
ज्या ज्या नेत्यांवर शाई फेकावीशी वाटते त्यांनी ती साठवावी. प्रत्येकाने ती शाई आपल्या बोटाला लावली पाहिजे आणि महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत करण्यासाठी ती शाई बॅलेट पेपरमधून अत्यंत संविधानिक मार्गाने वापरली पाहिजे. भाजपच्या ज्या नेत्यांना महापुरुषांच्या सन्मानापेक्षा स्वत:ची खुर्ची महत्त्वाची वाटत आहे, त्यांच्या खुर्च्या जनतेने हिसकावल्या पाहिजेत असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

 

खासदार उदयनराजे लाल महालात आले होते. ते येथेही निषेध नोंदवायला येतील, मला त्यांच्यासमोर बोलायची संधी मिळेल. ‘कुछ हम सुनाऐंगे, कुछ ओ कहेंगे’ असे काहीतरी होईल असे वाटले. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. कदाचित महापुरुषांचा झालेला अवमान त्यांना सहन झालेला नसेल आणि ते तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेले असतील असे आपण गृहीत धरू या. तसेच भविष्यात ते राजीनामा भिरकन भिरकावतील, असेही अंधारे म्हणाल्या.

वाचाळ विरांना जागा दाखवण्याची वेळ आली – प्रशांत जगताप
मागील चाळीस वर्षांच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत देशात, जगात कोणाची झाली नव्हती. बहुजन समाजाच्या महान नेत्यांची कुचंबणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे विविध पक्ष, संस्था, संघटना, तसेच पुणेकरांनी कडकडीत बंद पाळला, त्याबद्दल अभिनंदन. मात्र, या बंदमध्ये कोण कोण नव्हते, कोणाचा मोर्चाला विरोध होता, हे पुणेकरांनी समजून घ्यावे. वाचाळ विचारांना आवर घालत त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले. (Pune Band)

तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही – दीपक मानकर
कोश्यारी नावाच्या बादशहालाही धास्ती पडली असून, त्याला आता महाराष्ट्रातून जावे लागणार आहे. केंद्राकडून चुकीच्या पद्धतीने नेत्यांची पाठराखण करत आहे. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय शिवप्रेमी शांत राहणार नाही. कोश्यारींची हकालपट्टी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे माजी उप महापौर दीपक मानकर यांनी सांगितले.

 

परक्यांना ओळखून बाहेर काढा – अरविंद शिंदे
मागील पंधरा दिवसांपासून सर्वांना आवाहन करीत आहे. जे आले ते आले; पण जे आले नाहीत त्यांना लक्षात ठेवा. परक्यांतील आपली माणसे निवडायची आहेत, तसेच आपल्यातील परक्यांना ओळखून तांदळासारखे बाहेर काढायचे आहे. महापुरुषांचा अपमान आम्ही पुणेकर सहन करणार नाहीत. याचबरोबर शाईफेक प्रकरणातील पोलिसांवरील निलंबन मागे घ्यावे, असे काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी म्हटले.

…तर त्यांना राज्यात हिंडू देणार नाही – रूपाली पाटील-ठोंबरे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असूनही तिकिटांच्या आमिषाने भाजपचे लोक शांत आहेत.
नेत्यांची बेताल वक्तव्ये थांबली नाहीत, तर त्यांना राज्यात हिंडू देणार नाही. आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर टाका;
पण महाराजांबद्दल एकही बेताल वक्तव्य आम्ही मावळे ऐकून घेणार नाहीत,
असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला.

तुमच्या सत्तेवर आम्ही नांगर फिरवणार – संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे
केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेल्या जातीयवादी, मनुवादी नेत्यांनी महापुरुषांच्या बदनामीची सुपारी घेतली आहे.
बेचिराख झालेल्या पुण्यात येथूनच जिजाऊंनी बालशिवाजींना सोबत घेत सोन्याचा नांगर फिरवला होता.
तुमच्या सत्तेवरही आम्ही नांगर फिरवणार आहोत.
वक्तव्ये थांबली नाहीत तर मंत्रालय आणि संसदेवर मोर्चा काढण्यात येईल,
असा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी दिला. (Pune Band)

 

या संघटनांनी घेतला सहभाग
लाल महालाजवळील चौकात पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ,
छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड संघटना, दलित संघ, शिवसंग्राम, भीम आर्मी, बहुजन एकता, सह्याद्री सोशल फाउंडेशन,
संभाजी ब्रिगेड, वक्फ बोर्ड बचाव ॲक्टिव्हिस्ट, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, लोकजनशक्ती पार्टी,
जमात ए इस्लामी, युवक क्रांती दल, मातंग एकता दल, सह्याद्री कुणबी संघ, स्वराज्य संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,
शिवसेना ठाकरे गट, एआयएमआयएम, आम आदमी पक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल, समता परिषद आदी संघटनांनी सहभाग घेतला.

मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात सोमवारी रात्रीपासूनच फळबाजार, पालेभाज्या विभाग,
फुलबाजार सह इतर सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट होता.
तसेच परिसरातील भुसार बाजार, किराणा दूकान,
हॉटेल व इतर शहरातील दुकादारांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.

पाण्याची सोय
लक्ष्मी रस्त्यावर मोर्चातील नागरिकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती.
पुण्यातील  विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली.

 

Web Title :- Pune Band | With the presence of thousands in the ‘Pune Bandh’ march, the people of Pune united against those who insulted great men

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार