राहुल गांधींचा घणाघात ; म्हणाले, मोदी देशात ‘विष’ पसरवण्याचा प्रयत्न करतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघात मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी केरळमधील जनतेचे आभार मानण्यासाठी केरळला पोहचले. यावेळी राहुल गांधी यांनी रोडशो काढत जनतेेचे आभार मानले. त्यांच्या रोडशोला वायनाडवासीयांची गर्दी पाहायला मिळाली. लोकसभा निवडणूकीनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मोदींवर विष पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

आपली लढाई विष पसरवणाऱ्यांविरोधात –

केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी म्हणाले की आपली लढाई विष पसरवणाऱ्यांविरोधात आहे. राष्ट्रीय स्तरावर आपण विष पसरवणाऱ्यांविरोधात लढा देत आहोत. नरेंद्र मोदी विषाचा वापर करत आहेत. मी नक्कीच खूप भंयकर शब्द वापरात आहे, पण हे खरे आहे की नरेंद्र मोदी हे देशात विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते देशातील लोकांना राग आणि द्वेष वापरून वेगळे करु पाहत आहे. त्यांनी जिंकण्यासाठी देखील खोट्याचा वापर केला.

मोदींवर निशाणा साधताना ते असे देखील म्हणाले की, ते वाईट भावनांचे प्रतिनिधित्व करतात, ते राग, द्वेष, भीती आणि खोट्याचे प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींनी निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वायनाडवासीयांना संबोधित करताना ते म्हणाले, वायनाडवासीयांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. मग तो कोणीही असो, कोणत्याही विचारधारेचा असो. काँग्रेसचे दरवाजे सर्वांसाठी उघडेच आहेत.