Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”
मुंबई : Raj Thackeray-Manohar Joshi | राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास निधन झाले. गुरुवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षाचे होते. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.(Raj Thackeray-Manohar Joshi)
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते.
शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले.
१९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी दुपारनंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते.
बाळासाहेबांचे अत्यंत निष्ठावंत, विश्वासू सहकारी म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते.
शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.
वयोमानामुळे ते मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते.
त्यांचा जीवनप्रवास हा अतिशय प्रेरणादायी असा आहे.
माधूकरी लावून आपले शिक्षण पूर्ण करणे ते देशाच्या लोकसभेचे सभापती, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
सुरुवातीला माधूकरी लावून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
नंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग घेतले, त्यानंतर त्यांनी ‘कोहिनूर’ ची स्थापना केली.
मनोहर जोशी यांची राजकीय वाटचाल…
- १९७६ ला ते शिवसेनेचे मुंबईचे महापौर झाले
- मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते
- मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री.
- ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री
- मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक