Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सकाळीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) ट्विटरवरून बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महापरिनिर्वाणदिनी पोस्ट लिहीत महापुरुषांप्रती असलेला संकुचितपणा सोडून देण्याचे आवाहन सर्वसामान्य जनतेला केले.
त्यांच्या पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात राज ठाकरे (Raj Thackeray) लिहितात, “आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत असे असंख्य गुण वैशिष्ट्ये सांगता येतात.”
महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. pic.twitter.com/b8ZpALe9J6
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2022
बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मराठी माणसाला समजायला हवेत, अशी इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली. ते म्हणतात, “तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत.”
ठाकरे बाबासाहेब आंबेडकरांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाबद्दल चर्चा करताना म्हणतात, “बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या’दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले, पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते.
असो, बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकन्यांसाठी साप्ताहिक सुट्टी,
कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा,
संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली.
इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणार प्रभुत्व अद्भुत होतं. आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं.
माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली.”
बाबासाहेबांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा उल्लेख राज ठाकरेंनी केला.
शेवटी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ,
अर्थतज्ज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते.
अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम !” असे म्हणत राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.
Web Title :- Raj Thackeray | mns leader raj thackeray pay tribute to dr babasaheb ambedkar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार
U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती
Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात