“आम्ही कोणाला जिंकवू शकत नाही, मात्र आम्ही कोणालाही पाडू शकतो”

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप शिवसेनेची युतीबाबत बैठक झाली. मात्र या बैठकीत आम्हाला जागा देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.हे आमच्यासाठी धक्कादायक आहे,असं रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा,अशी इच्छा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.यामुळे आम्ही नाराज झालो आहोत,असं आठवले यांनी सांगितले आहे.रिपाइंला किमान एक जागा मिळायला हवी, दक्षिण मध्य मुंबईची जागा आम्हाला हवी असल्याची मागणी आठवले यांनी यावेळी केली.

गेल्यावेळी साताऱ्याची जागा आम्हाला मिळाली होती. मात्र आता ती जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. आम्हाला हव्या असलेल्या विधानसभेच्या ८ ही जागेवर शिवसेना विजयी झालेली आहे. त्यामुळे त्या जागाही आम्हाला मिळण्याची शक्यता नाही, असे तर्कही त्यांनी यावेळी लावले.

दरम्यान, आम्ही कुणाला जिंकवू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी आम्ही कुणालाही पाडू शकतो,असं सूचक वक्तव्यही आठवले यांनी केले. त्यामुळे आम्हाला कुणीही वापरून घेवू नये, असही आठवले यांनी म्हटलं.