Ration Card : रेशन कार्डमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींच्या मृत्यूची अथवा चुकीची माहिती देऊन राशन घेणाऱ्याला होईल ‘इतके’ वर्ष शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील बऱ्याच राज्यात रेशन कार्डामध्ये नावे जोडण्याचे आणि काढून टाकण्याचे काम सध्या चालू आहे. रेशन कार्डाच्या फसवणूक प्रकरणात अनेक राज्य सरकारांनी तपास तीव्र केला आहे. रेशन कार्डमध्ये एखाद्या व्यक्तीचे चुकीचे नाव असल्यास अथवा रेशन कार्डमध्ये नोंदवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कोट्यातील रेशन घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. पुनर्वसन विभागाने या प्रकरणाच्या फसवणुकीचा तपास सुरू केला आहे. अन्नपुरवठा विभाग फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत आहेत. जर आता आपण चुकीच्या कागदपत्रांसह रेशन कार्ड बनवल्यास अथवा चुकीच्या नावाने रेशन घेतल्यास तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

रेशन कार्ड बनवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे अनिवार्य

रेशन कार्ड तयार करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु लोक रेशन कार्ड मिळवण्यासाठी दारिद्र्य रेषेच्या खाली अथवा अंत्योदय योजनेच्या खाली जाण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करतात. बनावट रेशन कार्ड बनवणे भारत सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा आहे. बनावट रेशन कार्ड बनवल्याबद्दल दोषी ठरल्यास तुम्हाला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागू शकतो. असे कार्ड बनविण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याला लाच दिली अथवा अन्न खात्याच्या अधिकाऱ्याने लाच घेतल्यानंतर शिधापत्रिका बनवली तर या प्रकरणी शिक्षा अथवा दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ पोट्रेबिलिटी सुविधा लागू

केंद्र सरकारने देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड पोट्रेबिलिटी सुविधा लागू केली आहे. आतापर्यंत देशातील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या सुविधेखाली आहेत. या सुविधेद्वारे आता ग्राहकांना इतर राज्यांतही रेशन मिळू शकेल. यासाठी आता त्या व्यक्तीस त्या राज्याचा रहिवासी असणे आवश्यक नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लोकांना आता कोणत्याही राज्यात सहज रेशन मिळू शकेल. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारची ही योजना अत्यंत प्रभावी आहे.

बनावट रेशन कार्डबाबत सरकारचे निर्बंध कडक

रेशन कार्ड हे भारत सरकारचे मान्यताप्राप्त सरकारी कागदपत्र आहे. रेशन कार्डाच्या साह्याने लोक सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त दराने धान्य ( गहू, तांदूळ, डाळी) धान्य खरेदी करू शकतात. दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना एपीएल, बीपीएल आणि सर्वांत गरीब कुटुंबाना अंत्योदय शिधापत्रिका दिली जाते.