शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा ! ..म्हणून ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पश्चिम बंगाल राज्याची विधानसभा निवडणूक जवळ येत असून, तर निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये लढत होणार आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात ममता यांनी निवडणुकीचा अर्ज भरला आहे. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? त्यामुळेच ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

ममतांची जखम विरोधकांना जास्तच भारी पडणार –

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्याचे देशात चर्चा होत आहे. तर ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामुळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे. प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता बॅनर्जी म्हणत आहेत.

प्लॅस्टर ममता यांच्या पायाला, परंतु चिंता भाजपला –

ममता यांची पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खर आहे. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळ्यांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा पश्चिम बंगालातील जोर कायम आहे. पश्चिम बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध मोदी अशी झाली आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष पश्चिम बंगाल राज्यात काय घडते याकडे लागले आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक धार्मिक, व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भाजपला –

या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा काय? तर ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत. त्यांच्या राजवटीत ‘जय श्रीराम’ म्हणायला बंदी आहे. ममता त्यांची प्रतिमा हिंदूविरोधी बनवून भाजप येथे मते मागत आहे. यावर ममतांनी म्हटले, “मी ब्राह्मण आहे. धर्माचं राजकारण करू नका. मला हिंदू धर्म शिकवू नका. नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ममता रेया पाडा येथील एक हजार वर्षे जुन्या महारुद्र सिद्धनाथ मंदिरात गेल्या. तेथे पूजा केली. ‘जय श्रीराम’ला ममतांचा विरोध आहे, असा प्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणून ममता यांनी जाहीरसभेत ‘चंडी पाठ’ म्हणून दाखवले.पश्चिम बंगालची निवडणूक अशा धार्मिक आणि व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भाजपला द्यावेच लागेल.

मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात..अश्रूंचा बांध फुटतो..ते बरे चालते..

तर ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबड्या घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्द्यांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममता यांच्या पायास जखम झाली हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरु आहे. अशा अनेक मुद्द्यावरून सामना अग्रलेखातून शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.