दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग घटल्याचं समोर आलं आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेने चांगला वेग पकडला होता. त्यामुळे पहिल्या तिमाही जीडीपीमध्ये 8.1 टक्यांनी वाढ झाली होती परंतु दुसऱ्या तिमाहीमध्ये त्यात घट होऊन तो  7.1 टक्क्यांवर आला आहे. यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून  वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये तब्बल 1.1 टक्यांनी घट झाल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि ग्रामीण भागामधून मागणीत झालेली घट  ही दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीमागची प्रमुख कारणे आहेत असे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रॉयटर्स पोलमध्येही अर्थतज्ज्ञांनी पहिल्या तिमाहीच्या तुलनेच जीडीपीच्या वाढीचा वेग घटण्याची शक्यता वर्तवली होती.
 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये घट झाली असली तरी गतवर्षी याच कालावधीत असलेल्या जीडीपीतील वाढीच्या वेगापेक्षा यावर्षीचा वेग जास्त आहे.  दरम्यान, या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 7.5 ते 7.6 एवढा राहण्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेने वर्तवला होता.