बारामतीतील दि मर्चंट्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पवार यांनी दरवर्षीप्रमाणे व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, बाजारपेठेतील मंदीसाठी व केंद्र सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. सत्तापरिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणे शक्य नाही. लोकसभा निवडणुकीत परदेशातील काळा पैसा भारतात परत आणून सर्वसामान्यांच्या खात्यात जमा करण्याचे मोदींनी दाखविलेले स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरले.
त्यानंतर देशातील काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्यांनी घेतलेला नोटा बंदीचा निर्णयही फसला. त्यामुळे आर्थिक बाबतीत मोदी सरकारने घेतलेले निर्णय शहाणपणाचे नव्हते हे आता समोर येत आहे. इतर कोणते निर्णय चुकल्यास थोडाफार परिणाम होतो, मात्र आर्थिक राजकारणातील निर्णय चुकल्यास त्याचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेसह व्यापार उद्योगांना भोगावे लागतात, असे पवार म्हणाले.