शिर्डीतून 50 तोळ्याचे दागिने लांबविले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  शिर्डीतील नावाजलेल्या हॉटेल शांतीकमल येथून 50 तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्याने भरलेली पिशवी आज  चोरीला गेली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मालेगाव येथील पाटणी परिवार आणि नाशिक येथील शाह परिवाराचा विवाह सोहळा शिर्डीत शांतीकमल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये वधूला घालण्यासाठी वर पक्षाकडुन आणलेली सोन्याच्या दागीने एका पिशवीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून सोन्याची बॅगच लांबवली आहे.
सदर बॅगमध्ये साधारण पन्नास तोळे सोने असल्याचे सांगीतले जात आहे. शिर्डी पोलीसांनी याठिकाणी येवून सी.सी.टि.व्ही कॅमेराची पाहणी केली असून यात दोन युवक ब-याच वेळ याठिकाणी रेंगाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. याच दोन मुलांनी दागिन्यांवर पाळत ठेवत तसेच विवाह सोहळ्याच्या स्टेजजवळ नातेवाईक बोलण्यात गुंतलेले असताना सोप्यावर ठेवलेली बँग एक युवक घेवून फरार झाला असल्याचे कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. यासंबधी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सी.सी.टि.व्ही.चे तपासणी करत आहे. शिर्डी पोलीसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहे. शिर्डी पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.