‘…. राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मंत्र्यांवर आहे का?’ शिवसेनेचा सवाल

मुंबई : राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि राजीनामा सत्रावरून शिवसेनेने पुन्हा एकदा टीकेचा बाण सामनाच्या संपादकीयमधून सोडला आहे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. राफेल व्यवहारात एका मध्यस्थास काही कोटींची दलाली मिळाल्याचा स्फोट फ्रान्सच्या एका वृत्त संकेतस्थळावर केला आहे. म्हणजे राफेल प्रकरणात काहीतरी घोटाळा आहे हे राहुल गांधींचे म्हणणे बरोबर आहे. राफेल व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार किंवा दलाली प्रकरण घडले नसल्याचा निर्वाळा याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तो कोणाच्या सांगण्यावरुन ? राहुल गांधींनाच भाजपने तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता फ्रान्सच्या वृत्तपत्रांनीच राफेल घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा कोणी द्यावा ? की नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर आहे का ? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे ते आपली न्यायलयीन लढाई लढतील. मात्र देशमुख प्रकरणात ज्या तत्परतेने सीबीआय चौकशीचे आदेश दिले गेले तो सर्व प्रकार अनाकलनीय आहे. स्वत: परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यांना झापले. मात्र त्याचवेळी जयश्री पाटील यांच्या याचिकेत केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेतली. आपल्या देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. महाराष्ट्रात मोगलाई वगैरे अजिबात नाही. पण कायदा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर राजकीय विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी सर्रास केला जातो हे नक्की, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

– यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करुन धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता.

– साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे, असा टोला शिवसेनेने लगावला

– वनखत्याचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. देशमुखांवरील आरोप गंभीर होते मान्य केले तरी या आरोपांची सत्यता काय ? खरेखोटे सिद्ध व्हायचे आहे.

– परमबीर सिंग यांच्या पत्राचा प्रवास पाहता त्यांचा बोलविता आणि करविता धनी कोणी दुसराच आहे हे पटू लागले आहे.

– अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा हवेत गोळीबार होत असताना उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. येडीयुरप्पांना वेगळा न्याय आणि देशमुखांना वेगळा न्याय. हा काय प्रकार मानायचा ?

– महाराष्ट्रात विरोधी पक्ष रोज उठून ‘आज या मंत्र्याला घालवणार, उद्या त्या मंत्र्याची विकेट पडणार’ अशी वक्तव्ये करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा हातात नसत्या तर त्यांना ही बेताल वक्तव्य करण्याची हिंमत झालीच नसती.

– महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे.