अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार, शिवसेनेचं उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था – अमित शाह यांनी “युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे” अशा शब्दात शिवसेनेला इशारा दिला होता. अमित शाह यांनी स्वबळाबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेने आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. शिवसेना अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असते. येऊ द्या अंगावर, होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यामुळे युतीतील तणाव आणखीच वाढला आहे. अमित शाहांच्या वक्तव्यावर शिवसेनेनं आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, अमित शाहांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरुन त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि पहले मंदिर फिर सरकारचा नारा दिला. शिवसेनेची हीच भूमिका झोंबल्यामुळे आणि शिवसेनेच्या आसूड ओढण्यामुळेच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या जीभा आता सरकू लागल्या आहेत. भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच यातून दिसत आहे, असा प्रतिहल्ला शिवसेनेने भाजपवर केला आहे.

पाच राज्यांच्या निकलानंतर भाजपचे अवसान गळले आहे. भारतीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहे. या परिस्थितीत लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली ईव्हीएमशी युती होणार हे जहीर केले आहे, अशी टीका शिवसेनेनं केली.

काय म्हणाले होते अमित शाह?
आगमी निवडणुकीत भाजपसोबत न जाण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला.
शिवसेनेसोबत युतीबाबतच्या कन्फ्युजनमधून(संभ्रम) कार्यकर्त्यांनी बाहेर पडावं. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजप 48 पैकी किमान 40 जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला.