संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे वाटणारे ठार वेडे; शिवसेनेनं डागलं भाजपावर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून भाजप-शिवसेना यांच्यात विविध प्रश्नांवरुन राजकीय रणकंदन सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. स्थानिक स्वराज संस्थानच्या निवडणुकांमुळे दोन्ही पक्ष आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याला महाविकास आघाडीतील काँग्रेसने विरोध केला जात असतानाच भाजपाने मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामानातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जेव्हा अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे अब्दुल कलाम असे नामांतर केले. तेव्हाच महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? हे भाजपाने सांगावे असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात…
काँग्रेसने औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. परंतु काँग्रेसचा हा विरोध जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. निदान या विषयावरून सरकारात ठिणगी तरी पडेल, असे काही लोकांना वाटत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील आदी लोकांनी केला आहे. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी असा भाजपाचा आग्रह आहे. पण त्यात भूमिका स्पष्ट करण्यासारखे काय आहे. शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते. हे नामांतर लोकांनी स्वीकारले आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्येही लवकच दुरुस्ती होईल. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत अशतील तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
आता भाजपाच्या थयथयाटाबाबत बोलायचे तर अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्ग असे नामांतर होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मात्र ही नामांतरे केली तेव्हाच औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही. तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवले, असा प्रतिसवाल शिवसेनेने विचारला आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिर सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्याबाबतीतही तसाच निर्णय होईल, असा विश्वास शिवसेनेने या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. एमआयएमचा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत, हे ढोंग आहे. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे! असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.