अखेर तबलिघींना आपली चूक मान्य, न्यायालयाने दिली ‘अशी’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीमध्ये झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमामुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देश व परदेशातील मोठ्या संख्येने जमाती एकत्र आले होते. दिल्लीच्या निझामुद्दीन स्थित तबलिघी जमातच्या मरकझ प्रकरणात साकेत कोर्टाने 275 हून अधिक तबलिघी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

परदेशी तबलिघी जमाताचीच्या कार्यकर्त्यांना ‘टिल रायजिंग कोर्ट’ अर्थात एक दिवसांसाठी कोर्ट रूममध्ये उभं राहण्याची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. सोबतच सर्व परदेशी तबलिघींना 5 ते 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आलाय. कोरोना संक्रमणादरम्यान भारतात उपस्थित असलेल्या या परदेशी तबलिघी जमातीच्या आरोपींनी कोर्टासमोर आपली चूक कबूल केली आहे.
आपल्याकडून कोरोना नियमांची अवहेलना झाल्याचे त्यांनी मान्य केलं. इतकंच नाही तर परदेशी कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट कायदा आणि आयपीसीच्या अनेक कालमांचाही आपल्याकडून भंग झाल्याचे त्यांनी मान्य केलं आहे. हे सर्वजण चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिजी आणि इतर देशातून दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले होते.

यापूर्वी, साकेत कोर्टानं बुधवारी 91 तबलिघी जमातीशी संबंधित परदेशी आरोपींना जामीन मंजूर केला होता. या सर्वांना दिल्लीतील निझामुद्दीन मरकझमध्ये तबलिघी जमातीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. न्यायालयानं या सर्वांना 10-10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसंच त्याआधी साकेत कोर्टानं मंगळवारी याच प्रकरणाशी निगडीत 125 परदेशी नागरिकांना जामीन दिला होता. दिल्ली पोलिसांनी मरकझ प्रकरणातील 900 पेक्षा अधिक परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हिजा नियम आणि कोरोना दिशा-निर्देश धुडकावून लावत हे सर्व परदेशी नागरिक दिल्लीत आले होते.