Coronavirus Lockdown : Airtel नंतर आता Vodafone चा कोट्यावधी ग्राहकांना दिलासा, ‘एवढ्या’ दिवसांसाठी वाढवली वैधता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूरसंचार कंपन्यांनी 25-30 कोटी प्रीपेड मोबाइल ग्राहकांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊन दरम्यान रिचार्ज न करणार्‍या ग्राहकांची वैधता 17 एप्रिलपर्यंत राहणार आहे. तसेच आवश्यक कॉल करण्यासाठी 10 रुपयांपर्यंतचा टॉकटाईम देखील देण्यात येणार आहे. बीएसएनएल, भारती एअरटेल नंतर आता व्होडाफोनने देखील आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या योजनेची वैधता 17 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तसेच शिल्लक संपल्यानंतर आपत्कालीन म्हणून 10 रुपयांपर्यंत टॉकटाईम देण्याचे ही सांगितले आहे.

एअरटेल आणि बीएसएनएलनेही वाढविली वैधता

लॉकडाऊन पाहता एअरटेलने देखील प्रीपेड ग्राहकांच्या योजनांची वैधता वाढविली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांच्या योजनांची वैधता 17 एप्रिलपर्यंत वाढवित आहोत आणि ग्राहकांच्या फोन नंबरवर 10 रुपयांचा टॉकटाईम देखील देण्यात येईल. कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी शास्वत शर्मा म्हणाले की कोरोना विषाणूच्या संकटाच्या वेळी लोकांना आपल्या कुटूंबाशी संपर्क साधता यावा म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएलने 20 एप्रिलपर्यंत वाढविली वैधता

बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन नगर लिमिटेडने (MTNL) कोरोना विषाणू या साथीच्या आजाराबाबत देशात असणारे लॉकडाऊन लक्षात घेता सर्व प्रीपेड मोबाइल फोनची वैधता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलने 20 एप्रिलपर्यंत सर्व प्रीपेड मोबाइल फोनची वैधता वाढविली आहे. तसेच, सर्व प्रीपेड मोबाईलवर 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम उपलब्ध असेल, हे देखील स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्याचा थेट लाभ झिरो बॅलन्स असलेल्यांना दिला जाईल.

तसेच ट्रायने रविवारी सर्व कंपन्यांना सांगितले की देशभरातील लॉकडाऊन दरम्यान प्रीपेड ग्राहकांना अखंडित सेवा मिळविण्यासाठी आपल्याला त्यांची वैधता वाढविण्यासह इतर आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.