जीप कॅनॉलमध्ये पडून ३ जण ठार

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन

चालकाचा ताबा सुटून जीप कॅनॉलमध्ये पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावाजवळ घडली आहे. जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे.

सृष्टी संतोष साळुंखे (वय ९), महेश जगन्नाथ बल्लाळ (वय २६) आणि दादा गोरख बल्लाळ (वय ४) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील वावरहिरे गावातून साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय रविवारी रात्री उशीरा भाग्यश्री टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जीपमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. लोणंद च्या जवळच्या एका ढाब्यावर त्यांनी जेवण केले. त्यावेळी चालक महेश बल्लाळ याने दारू पिली जेवणानंतर पुढे प्रवासादरम्यान, जीप पाडेगावजवळ आलेली असताना वळणावर चालकाचा ताबा सुटून ती कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी पाण्यात बुडून चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पाडेगावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.