अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावाजवळील प्रवरा पात्रात आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
समर्थ दीपक वाळके ( वय – १०), रोहित चंद्रकांत वैराळ ( वय ११), वेदांत विनोद वैराळ ( वय-९) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे मंगळापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मंगळापूर गावाजवळ प्रवरा पात्रात आज दुपारी मृत शाळकरी मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडाली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी पात्राजवळ गर्दी केली होती. मुलाचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपुर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.