नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात जवळपास 300 पोलीस जखमी झाले. या हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील ट्विटरने मोठी कारवाई करत तब्बल 500 अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
यासंदर्भात ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर जवळपास 500 ट्विटर अकाऊंट बंद केले आहेत. इतकेच नव्हे, तर काही अकाऊंटना लेबल लावली असून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे. या अकाऊंट्सवरून चिथावणीखोर पोस्ट शेअर केल्यास किंवा तशा आशयाच्या पोस्ट केल्यास त्याविरोधात रिपोर्ट केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान गेल्या 70 दिवसांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नाहीतर अनेक आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात तब्बल 300 पोलीस जखमी झाले असून, या प्रकरणी 200 जणांना अटक केली आहे.