मला ‘हिंदुत्व’ सिद्ध करण्याची गरज नाही, CM ठाकरेंची ‘मनसे’ वर ‘खोचक’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांगलादेशींना देशाबाहेर हकलून देण्याच्या मागणीसाठी मनसेने आज मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. आपल्याला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. तसेच शिवसेनेनं कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचे त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले.

या बैठकीमध्ये सीएए आणि एनआरसी संदर्भात शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून सांगितले. यावळी उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोकं म्हणत आहेत की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्याने आम्ही हिंदुत्व सोडलंय, पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचे ठरले आहे. जगला ठाऊक आहे आपले हिंदुत्व काय आहे. समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारलं जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.