बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक ! राज्य सरकार पोलीस भरती करण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तब्बल दहा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरती करण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती आहे.

उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय झाल्यास बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरु होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली आहे. परंतु आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदावर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला जुलै महिन्यात देण्यात आल्या होत्या. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

पोलीस शिपाई गट – क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 6726 पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मिती 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 500 हून अधिक अशी एकूण 12 हजार 538 पदे भरण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी सांगितले होते.