‘वंचित’चे ४८ उमेदवार ECच्या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात यचिका दाखल करणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी स्पष्ट केले आहे. वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांनी याबाबत माहिती दिली.

लोकसभा निवडणूकीत मतमोजणीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीत फरक असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्ट केले होते. त्याबाबतचा खुलासा देखील त्यांनी निवडणूक आयोगाला मागितला होता. परंतू निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही.

४८ उमेदवार दाखल करणार उच्चन्यायालयात याचिका दाखल
राज्यातील सगळे म्हणजेच ४८ लोकसभा मतदार संघातून उभे राहिलेले उमेदवार येत्या ८ दिवसात मुंबई उच्चन्यायलयात रीट पिटीशन दाखल करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. मतमोजणी झाल्यानंतर समोर आलेल्या आकड्यांमधील तफावती नंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे निवडणूक आयोगाकडे याबाबत आठ दिवसात खुलासा करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

लोकसभा निवडणूक पार पडल्यावर तब्बल ३५० मतदार संघात आकडेवारीत तफावत असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. आता निवडणूक आयोग कोणताही खुलासा करत नसल्याने ते मुंबई उच्चन्यायालयात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात वंचितचे उमेदवार याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.