चाकण हिंसेचा मराठा आंदोलनाशी काहीही संबंध नाही : आर. के. पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा आॅनलाइन – चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला होता. मराठा आरक्षण आंदोलन हे दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास या भागात मोठी जाळपोळ-तोडफोड झाली होती. पोलिस ठाणे पेटवून देण्याचा प्रयत्नदेखील झाला होता. मात्र, या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे.

पद्मनाभन म्हणाले, चाकण येथे ३० जुलैला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन केले होते. आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपल्यानंतर काही समाजकंटकांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया केल्या. तोडफोड करणाऱ्यांचे फोटो आणि चित्रफीती पोलिसांच्या हाती लागली असून त्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांची पळापळ झाली आहे. मात्र, आता ते मराठा आंदोलकांच्या नावाखाली आश्रय घेत आहेत.

मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच माझी भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांचे फोटो दाखविले. हे तुमचे आंदोलक आहेत का?, याबाबत विचारले असता यापैकी एकही आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याचे आयुक्त पद्मनाभन म्हणाले. चाकण येथील घटनेच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, सध्या आरोपींची धरपकड सुरू आहे.

‘७ वी’च्या विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप