PoK कधी होणार भारताचा ‘हिस्सा’ ? केंद्रीय राज्यमंत्र्याचे ‘सूतोवाच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात झालेल्या उरी आणि बालाकोट हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करत मोदी सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. भारताने केलेल्या या कारवाईनंतर हे सरकार गंभीर आहे असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता भारत पाकव्याप्त काश्मीर परत घेईल, ही भीती पाकिस्तानच्या मनात आहे. त्यासाठी पाकिस्तान पीओकेचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केला.

जितेंद्र सिंह म्हणाले की, १९९४ मध्ये पीओकेबाबत एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. मात्र तत्कालीन सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता तसं होणार नाही. आता पीओके भारताचा आहे. आता पाकिस्तानही याबाबतीत मोदी सरकारला गंभीरतेने घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कलम ३७० हटविण्यावरुन अनेक चर्चा झाली. पीओके भारताचा भाग कधी झाला यावर मी काही भाष्य करणं उचित राहणार नाही. मात्र कलम ३७० हटविताना त्याला कसं संपुष्टात आणणार? काही तरतुदी वगळणार का? मात्र काही न बोलता सगळं झालं. तसेच पीओकेच्या बाबतीत होईल तेव्हा आपण चर्चा करु असे संकेत जितेंद्र सिंह यांनी दिले.

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. मागील ६ महिन्यापासून तिथे कोणतीही हिंसा झाली नाही. गेल्या ३० वर्षातील हा बदल आहे. पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसा होत होती. मात्र आता तेथील जनजीवन सुरळीत सुरु आहे. श्रीनगरच्या बाजारपेठेत गर्दीही होत असते, असा दावाही जितेंद्र सिंह यांनी केला.

दरम्यान, काश्मीरात सगळं सुरळीत चाललंय तर मग तेथील नेत्यांना नजरकैदेत का ठेवलं असा प्रश्न विचारला असता त्यावर जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘यात काहीच तथ्य नाही. अमित शहा दयाळू गृहमंत्री आहेत. पंडित नेहरु पंतप्रधान असताना शेख अब्दुला यांना तामिळनाडूत नजरकैदेत ठेवलं होतं. यांच्यात चांगले संबंध होते. त्यावेळी इंटरनेट नव्हते, फोनही नव्हता. हाऊस अरेस्ट म्हणजे त्या व्यक्तीचा संपर्क कमी करावा. राजकीय कैदी असतील तर त्यांना घरातच ठेवलं जातं. काश्मीरात त्यांच्या घरात ४ पोलीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवलंय असं बोलता येत नाही.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/