Video : तुमची भूक नेमकी भागणार तरी कधी ? राजू शेट्टी विचारणार अंबानींना प्रश्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे अंबानी आणि आदानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयक लादली जात आहेत. गोर गरीब शेतकऱ्यांचे व्यवसाय घेऊन बड्या उद्योजकांची भूक नेमकी भागणार तरी कधी आहे, याची विचारणा करण्यासाठी मुंबईतील अंबानी इस्टेटवर राज्यातील शेतकरी संघटना मंगळवारी (दि.22) धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी ( Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी दिला आहे.

पुण्यात बुधवारी (दि. 6 ) झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढावा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, प्रतिभा शिंदे, राजूल पोकळे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द व्हावेत. तसेच उसाचा एफआरपी कायदा सर्व पिकांना लागू करावा. हमीभाव कायदा करावा, आदी मागण्या आहेत. सर्व शेतकरी संघटना एक होऊन लढत आहेत. तरीही मोदी का अडून बसले आहेत. सरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. यात जे शेतकरी हुतात्मा झाले आहेत त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. सर्व शेतकऱ्यांनासोबत घेऊन हा मोर्चा काढणार आहे.

डॉ. आढाव म्हणाले की, शेतकरी आंदोलनकर्त्याना तुरुंगात टाकणार आहेत अशी त्यांची लक्षणे दिसत आहेत. यात जुने जे कायदे आहेत ते रद्द करा असे म्हणत आहेत. यात दोष जुन्या कायद्याचा नसून केंद्राच्या नाकर्तेपणाचा आहे.